समाज कल्याण विभागात सुरू झाला ‘समता सप्ताह’, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
लातूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभागात बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या सामाजिक समता सप्ताहाला औपचारिकरीत्या सुरुवात झाली. तत्पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त लातूर जिल्ह्यात ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ाचे आयोजन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. याचा औपचारिक प्रारंभ जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात बुधवारी झाला. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
या सप्ताहाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रसार व महामानवांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे. यावेळी लातूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार विजेते बालाजी धोंडीराम पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यालयीन अधिक्षक मोहन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी शिवाजी शिरडे, आयुक्त कार्यालय, पुणे येथील लेखाधिकारी अनिल हगवाणे, समाज कल्याण निरीक्षक राहुल काळे, विक्रम जाधव, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, लिपीक शिवराज गायकवाड, व्यंकट लामजणे, प्रशांत चामे, राजकुमार पवार यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
आश्रमशाळा व दिव्यांग शाळांमध्ये व्याख्याने व स्पर्धा
या सामाजिक समता सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील विविध आश्रमशाळा, दिव्यांग शाळा तसेच शासकीय वसतिगृहात मानवी हक्कांवर आधारित व्याख्याने, निबंध आणि वाचन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन व माहितीपर शिबिरेही भरवण्यात येणार आहेत. या उपक्रमात जिल्ह्यातील इतर शाळा व संस्था यांनीही सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले आहे.



0 Comments