महाराष्ट्रात लॉकडाऊन १६ दिवसांनी वाढवला;३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम मुख्यमंत्री -उद्धव ठाकरे
मुंबई:(प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन किमान ३० एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधिले.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं राज्यात आतापर्यंत ११० मृत्यू झाले आहेत. एकट्या मुंबईत आतापर्यंत ६४ बळी गेले आहेत. लॉकडाऊनसह अन्य प्रतिबंधक उपाय सुरू असूनही संसर्ग वाढतच असल्यानं राज्य सरकारची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यात मुंबईत १ हजार पॉझिटिव्ह सापडले आहेत. ६५ ते ७० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. हाय रिस्क असलेले रुग्ण दगावले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गाफिल राहता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबईचे विमानतळ जगाचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे सहाजिकच मुंबईत प्रादुर्भाव वाढला. मात्र मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरुन रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. असेही यावेळी त्यांनी सांगितले.
राज्यात पहिला रुग्ण आढळून पाच आठवडे झाले. आता गुणाकाराचा कालावधी आहे. त्याचा वेग मंद करण्यात यश आले असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली
0 Comments