सरपंच पदाची उत्सुकता शिगेला;सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार
कासार बालकुंदा:{प्रतिनिधी मारुती लोहार} निलंगा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून,निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना आता सरपंचपद कुठल्या वर्गासाठी आरक्षित होईल, याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. सरपंच पदाचे आरक्षण कधी जाहीर होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीनंतरच आता गावा-गावपातळीवरील सरपंच ठरणार आहेत. मागील वर्षांपासून कोविड-19 च्या संकटामुळे सरकारने स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती.त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, सदस्यांना काही महिने मुदतवाढ मिळाली. त्यानंतर सरकारने ग्रामपंचायती बरखास्त करत प्रशासकांची नियुक्ती केली.आँक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा ओसरला. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा व त्याचबरोबर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता.राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, तत्पूर्वी सरकारने थेट जनतेमधून ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडण्याचा निर्णय मागे घेऊन सदस्यांमधूनच सरपंच निवडीचा निर्णय घेतला.त्यामुळे अनेकांना सरपंच होण्याचे वेध लागले होते.परिणामी,निवडणुकीत चुरस निर्माण होऊन गावोगावी वातावरण तापले होते. प्रत्येक्ष निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या आहेत.या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. यातून अनेक ठिकाणी प्रस्थापितांना मोठे धक्के बसले आहेत, तर काही ठिकाणी तरूणांना संधी मिळाली आहे. या निवडणुकीनंतर गावातील राजकारणाचे चित्रच पालटले आहे. आता नवनिर्वाचित सदस्यांना कोण सरपंच होणार याची उत्सुकता लागली आहे. आरक्षण सोडतीनंतर सरपंच निवडीला वेग येणार आहे. एकंदर, शासनाकडून सरपंचपदाच्या आरक्षणाला कार्यक्रम जाहीर कधी होणार याकडे गावकर्यांचे व गांवपुढार्यांचे, नूतन ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष लागले होते. शासन नियमानुसार ज्या प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होईल, त्याचा आम्ही स्विकार करू, असे नवनिर्वाचित सदस्य श्रीमंत मोरे म्हणाले. निलंगा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्यांमध्ये जास्त प्रमाण नवतरूणांचे असल्याने येणार काळात त्यांच्याकडून गावस्तरावर विकासात्मक घडी बसवण्याची जबाबदारी आल्याने गावातील नागरिकांच्या सोयी-सुविधा याकडे लक्ष देण्याचे आश्वासक जबाबदारी सदस्यांवर आली आहे. त्यामुळे येणार्या काळात गांवकर्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

0 Comments