आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अशांतता निर्माण व्हायला नको - ॲड. प्रकाश आंबेडकर
बी डी उबाळे
औसा : भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गांना आरक्षण देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर मागास प्रवर्गातील जनतेत त्यांचे आरक्षण अबाधित राहील किंवा नाही यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मोर्चे आंदोलन आणि उपोषण करीत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अशांतता निर्माण व्हायला नको असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. औसा येथे आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी आरक्षण बचाव यात्रेस संबोधित करताना ते बोलत होते पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजातील गरिबाला आरक्षण देण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही. परंतु त्यांच्या आरक्षणासाठी कायद्याच्या चौकटीत बसेल अशी पर्यायी व्यवस्था होणे आवश्यक आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीचे नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी चूक आहे किंवा बरोबर आहे याबद्दल कसल्याही प्रकारचा खुलासा करीत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सोयीस्कर रित्या हा खुलासा टाळत असल्याची खंत व्यक्त करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागू नये असे मत स्पष्ट केले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचे रक्षण व्हावे यासाठी जनजागृती करण्यासाठी आपण आरक्षण बचाव यात्रा काढली असून दिनांक 07 आगस्ट 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आरक्षण बचाव यात्रेचा समारोप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनीही आपले विचार व्यक्त केले. आरक्षण बचाव यात्रा औसा शहरात येतात किल्ला मैदानावरून वाजत गाजत या रॅलीचा लातूर वेस हनुमान मंदिरा जवळ समारोप झाला. औसा येथील कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष सलीम शेख आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, अँड जयराज जाधव, महावीर बनसोडे, चांगदेव माळी, युवराज चव्हाण, हनुमंत कांबळे, लिंबराज जाधव, विशाल माळी, सोमनाथ कांबळे, सत्यभामा रोंगे, राजेंद्र बनसोडे, पत्रकार राम कांबळे यांच्यासह अनुसूचित जाती जमाती व ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.



0 Comments